योद्धा एक्सप्रेस न्यूज!!योगाचा एक तास…संतुलनासाठी !
प्रतिनिधी मुख्य संचालक श्री प्रकाश दंडगव्हाळ नाशिक

YVCM हेल्पिंग फाउंडेशन एनजीओ संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ
योद्धा एक्सप्रेस न्यूज!!योगाचा एक तास…संतुलनासाठी !
२१ जून. जागतिक योग दिन. फिटनेससाठी आज जगभर योगाभ्यासाला पहिली पसंती दिली जात आहे.
योगासनांचे विविध प्रकार आणि प्राणायाम यांचा एकत्रित परिणाम शारीरिक फिटनेसच्या बरोबरीनेच मानसिक सक्षमताही वाढवतो. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे कलाकार जोडपं योगाच्या माध्यमातूनच आपला फिटनेस जपत आहेत.
व्यावसायिक रंगभूमीवर आणि चित्रपट-मालिका क्षेत्रात ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे पती-पत्नी लोकप्रिय आहेत. ‘गंध निशिगंधाचा’ या चंद्रलेखाच्या नाटकात त्या दोघांनी पहिल्या व्यावसायिक भूमिका केल्या. सोशल मीडियावर आणि फेसबुकवर ही दोघं एकत्रितपणे अनेक रील्स आणि व्हिडीओ टाकत असतात. यातले काही व्हिडीओ योगासनांवरचे देखील असतात. अतिशय फिट कपल असंच त्यांचं वर्णन करता येईल. त्यांच्या फिटनेसचं कारण विचारलं असता त्यांनी ‘आम्ही नियमितपणे योगा करतो’ असं स्पष्टपणे सांगितलं.
अविनाश नारकर हा गेली अठरा वर्षं योगा करतोय. ऐश्वर्या गेल्या पाच-सहा वर्षांपासून ऑनलाइन योगा करत आहे. तसं पाहता कोरोनापासून तिने नियमितपणे योगाच्या अभ्यासाला सुरुवात केली.
योगा केल्यामुळे मन शांत राहतं असं ही दोघंही सांगतात. अविनाश सांगतो, “दिवसाचा एक तास मी योगासाठी देतोय. तो तास माझ्यासाठी फार मोलाचा असतो. योगा करण्यामुळे अनेक फायदे होतात.
जसजसं वय वाढत जातं तसतसं नियमित योगा करण्याने आपलं चित्त संतुलित राहतं. खरं सांगू, गेली अनेक वर्षं मी कोणावरही चिडलेलो नाही. सेटवर चहा जरी वेळेवर नाही मिळाला तरीही मी स्पॉट बॉयवर चिडत नाही.
मुंबईच्या ट्राफिकमधून जायचं असतं. अनेकांची त्यावेळी चिडचिड होते. पण त्यावेळी सकाळी केलेला प्राणायाम मला साथ देतो. योगा केल्यामुळे कित्येक वर्षांत मी आजारी पडलेलोच नाही. घरगुती उपायांनी क्षुल्लक आजारावर मात करता येते. योगा करण्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार जवळ फिरकत देखील नाहीत.
ऊर्जा-उत्साह वाढतो. म्हणजेच भावना आणि ऊर्जेचं जे संतुलन आहे ते चांगल्या पद्धतीने राखलं जातं. ते फार महत्त्वाचं आहे. ज्या ऊर्जेने दिवस सुरू होतो त्याच ऊर्जेने दिवस संपला पाहिजे.” अविनाश जे बोलत होता ते ऐश्वर्याही ऐकत होती आणि त्याला दुजोरा देत होती.
आपला अनुभव सांगताना ऐश्वर्या म्हणाली, “आम्ही दररोज १४ ते १५ तास सेटवर काम करतो. नियमित योगा करत असल्यामुळेच न थकता एवढं काम करणं शक्य होतं. सकाळचा तोच उत्साह पॅकअप होईपर्यंत असतो. योगाच्या अभ्यासामुळे कोणाबद्दलही मनामध्ये दुजाभाव येत नाही.
मनाचं संतुलन टिकण्यासाठी योगा फार महत्त्वाचा आहे. आम्हा दोघांना रोज एकत्र योगा करता येत नाही. कारण आमच्या वेळा जमत नाहीत. मात्र आपापल्या सोयीनुसार आम्ही प्रामाणिकपणे योगासाठी वेळ देतो.”
हल्लीच्या रॅट रेसमध्ये कलाकार त्यांच्या शूटिंगमध्ये इतके बिझी असतात, की त्यांना विश्रांतीसाठी वेळ मिळत नाही.
त्या तरुणांना अविनाश सांगतो, “योगा करणं हे खूप गरजेचं आहे. इतर स्वरूपाच्या फिजिकल ट्रेनिंगमुळे आपलं शरीर सुदृढ होतं. बांधेसूद होतं. पण शरीराचा सुडौलपणा मनामध्ये आला तरच तुमचे मनोविहार जे आहेत ते सुविहित होतात. सर्वांबरोबर संबंध चांगले राहतात. म्हणूनच सकाळी तरुणांनी योगा करणं आवश्यक आहे. त्याची त्यांच्या दिवसाच्या जडणघडणीत नक्कीच मदत होईल.”