नाशिक शहर न्यूजमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्य

आता एकरकमी टोल भरा अन् जा सुस्साट; राष्ट्रीय महामार्गावर वार्षिक व ‘लाइफटाइम पास’, केंद्र सरकारचा प्रस्ताव

प्रतिनिधी हरीश चव्हाण नासिक (08 February, 2025, 06:00 AM)

आता एकरकमी टोल भरा अन् जा सुस्साट; राष्ट्रीय महामार्गावर वार्षिक व ‘लाइफटाइम पास’, केंद्र सरकारचा प्रस्ताव

एरव्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना ठिकठिकाणी येणाऱ्या टोलनाक्यांवर थांबावे लागते. त्यातच सुट्ट्या पैशांवरून अनेकदा वादही उद्भवतात. आता या कटकटीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने वार्षिक आणि लाइफटाइम (आजीवन) पास आणण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील प्रस्तावावर रस्ते वाहतूक मंत्रालय गांभीर्याने विचार करत आहे.

खासगी वाहनचालकांना टोलच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी तसेच टोलमध्ये सहजता आणण्यासाठी केंद्र सरकार वार्षिक आणि आजीवन पास आणण्याचा विचार करत आहे. त्यानुसार वार्षिक पास हा ३ हजार रुपयांचा, तर १५ वर्षांचा आजीवन पास ३० हजार रुपयांचा असेल. विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या फास्टॅग प्रणालीलाच ही यंत्रणा अद्ययावत करण्यात येईल. त्यामुळे नवी प्रणाली अस्तित्वात आल्यास त्यासाठी आणखी कागदपत्रे सादर करण्याची किंवा नवीन यंत्रणा आणण्याची कोणतीच गरज भासणार नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक मंत्रालय या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहे. खासगी कारसाठी प्रति किलोमीटर टोल दर बदलण्याचा विचार मंत्रालय करत आहे. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. नव्या वार्षिक पासवरून कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरून अमर्यादित प्रवास करता येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, आपले मंत्रालय अशाप्रकारचा प्रस्ताव प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२३-२४मध्ये एकूण ५५ हजार कोटी रुपयांचा टोल महसूल जमा करण्यात आला. मात्र, त्यात खासगी वाहनधारकांचा टोलचा वाटा फक्त ८ हजार कोटी रुपये इतकाच होता. ५३ टक्के व्यवहार हे खासगी कारसाठी झाले, पण टोल संकलनात त्यांचा वाटा फक्त २१ टक्के होता. खासगी वाहनांकडून राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वाहतूक होते, तर व्यावसायिक वाहनांची वाहतूक दिवसा आणि रात्री जवळजवळ सारखीच असते.

टोलची समस्या कायम

देशातील सर्व महत्त्वाच्या महामार्गांवर फास्टॅग प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असली, तरी धीम्या नेटवर्कमुळे टोल आकारण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नव्या प्रणालीमुळे वाहनचालकांना कोणताही वेळ न घालवता सहजपणे टोलनाका पार करता येईल. त्यामुळे टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगाही लागणार नाहीत.

ठळक वैशिष्ट्ये

नवा वार्षिक पास ४ हजारांऐवजी ३ हजार रुपये असेल.

१५ वर्षांसाठी लाइफटाइम पास हा ३० हजार रुपयांचा असेल.

नवीन पास फास्टॅग प्रणालीशी जोडले जातील. त्यासाठी नवीन उपकरणाची किंवा कागदपत्रांची गरज भासणार नाही.

वार्षिक किंवा लाइफटाइम पासवर वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर अमर्यादित वेळा प्रवास करता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button