योद्धा एक्सप्रेस न्युज !! महामानवाचा स्मृतिगंध
प्रतिनिधी हरीश चव्हाण नासिक

प्रतिनिधी हरीष चव्हाण नासिक योद्धा एक्सप्रेस न्युज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज १४ एप्रिल रोजी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हा दिवस केवळ एक उत्सव नसून, प्रेरणास्रोत आहे. बाबासाहेबांचा विविध विषयांवरील सखोल अभ्यास अद्वितीय होता. राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, कामगार हक्क, शेती आणि ग्रामीण विकास या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या विचारांचे द्रष्टेपण आजही तितकेच समर्पक वाटते. त्यांचे विचार केवळ भारतातच नव्हे, तर जगभर पोहोचले.
त्यामुळेच जगभरात त्यांच्या स्मृती जागवणारी स्मारके उभारण्यात आली आहेत. ही स्मारके म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि मानवी हक्कांचे जागतिक प्रतीक आहेत.
जगातील पहिला पुतळा – कोल्हापूर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत उभारलेला पहिला पुतळा कोल्हापुरातील बिंदू चौकात ९ डिसेंबर १९५० रोजी उभारण्यात आला. जगभरात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वाधिक पुतळे असल्याची नोंद आहे; मात्र, कोल्हापूर येथील मराठा नेते भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने कोल्हापुरातील बिंदू चौकात महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे ९ डिसेंबर १९५० रोजी उभारण्यात आले होते. महात्मा फुले यांचा पुतळा बाबुराव पेंटर यांनी साकारला होता, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बाळ चव्हाण यांनी निर्माण केला. खास बाब म्हणजे, बाबासाहेबांनी स्वतः कोल्हापूर भेटीदरम्यान हा पुतळा पाहिला होता.
महू : जन्मभूमीचे स्मारक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांची लष्करी नोकरी होती आणि तेथेच त्यांचे वास्तव्य होते. आज महू हे ‘आंबेडकर नगर’ म्हणून ओळखले जाते. बाबासाहेबांच्या जन्मस्थळी सरकारने उभारलेले स्मारक हे लाखो लोकांना प्रेरणा देणारे ठिकाण बनले आहे. दरवर्षी येथे लाखो लोक भेट देतात.
टोकियो, जपान :
बौद्ध विहारांतील आदरांजली
जपानमधील, विशेषतः टोकियो येथील बौद्ध विहारांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष सन्मानाने स्थान दिले गेले आहे. त्यांच्या मूर्ती, छायाचित्रे आणि कार्याचे वर्णन करणारे फलक या विहारांमध्ये लावले गेले आहेत. काही ठिकाणी त्यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाचेही औचित्याने आयोजन केले जाते. जपानी बौद्ध भिक्षू बाबासाहेबांना नवबौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान मानतात. डॉ. आंबेडकरांनी स्वीकारलेल्या नवयान बौद्ध धर्माची समतावादी मांडणी जपानी समाजालाही प्रभावित करणारी ठरली आहे. आज टोकियोतील हे बौद्ध विहार केवळ धार्मिक स्थळे नाहीत, तर बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाची जिवंत प्रतीकं बनली आहेत.
====================================👇👇👇👇👇👇👇👇👇👇
बीड जिल्ह्यात शिक्षक बदली प्रकरणात ३९ कोटींचा घोटाळा
बीड जिल्ह्यात २०१४ साली जिल्हा परिषद शिक्षक आंतर जिल्हा बदलीमध्ये तत्कालीन मंत्री सुरेश धस, जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, जिल्हा परिषद शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांनी तब्बल ३९ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बीड मधील बिंदू नामावलीच्या घोटाळ्यासंदर्भात सुरेश धस यांनी तक्रार केल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बाळासाहेब सानप म्हणाले की, १४ वर्षानंतर बीड जिल्हा परिषदेत बिंदू नामावली प्रश्न उद्भवला आहे. ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या सुरू होत्या, त्या काळात २०१४ साली सर्व शिक्षकांनी मागणी केली होती की, बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला परत यायचे आहे. त्यावेळी राज्याचे मंत्री सुरेश धस होते. त्या काळात ही भरती झाली आहे. त्या काळात प्रत्येक जणांकडून तीन लाख रुपये घेण्यात आले. तेराशे लोकांचे तीन लाख रुपये म्हणजेच एकूण जवळपास ३९ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असा आरोप त्यांनी केला.
सुरेश धस यांनी स्टेटमेंट केले की, पंकजा मुंडे मंत्री असताना हा घोटाळा झाला आहे. परंतु पंकजा मुंडे त्यावेळी मंत्री नव्हत्या. या भरती प्रक्रियेत पंकजा मुंडे यांचा कुठलाही संबंध नव्हता. २०१४ साली इतके सगळे शिक्षक बीडमध्ये आले, तेव्हा ७०० लोकांना पगार मिळत नव्हता. दीड वर्ष शिक्षकांनी येथे आंदोलन केले होते. या आंदोलनाला कारणीभूत हे तिघेच आहेत. जागा नसताना भरती करून घेण्यात आली, याचे देखील कारण हे तिघेच आहेत. त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाळासाहेब सानप यांनी केली आहे.
******************************************