योद्धा एक्सप्रेस न्युज!! कोल्हापूरच्या 3 उड्डाणपुलांचे प्रस्ताव केंद्राकडे
प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

सांगली फाटा-उचगाव, तावडे हॉटेल-शिवाजी पूल, दाभोळकर कॉर्नर-परीख पुलासह बास्केट ब्रिज, कागलचा समावेश
कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा ते उचगाव, तावडे हॉटेल ते शिवाजी पूल आणि दाभोळकर कॉर्नर ते परीख पूल या तीनही उड्डाणपुलांचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यासह पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रिज आणि कागल शहरातील उड्डाणपुलाचाही यामध्ये समावेश असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी सांगितले.
पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा ते उचगाव या मार्गावर भराव टाकून रस्ता उंच करण्यात येणार होता. मात्र, सध्याच्या भरावाने पुराचे पाणी साचून कोल्हापूर शहरात महापुरासारखी परिस्थिती निर्माण होते, त्यात आणखी भराव टाकला तर शहरच जलमय होईल, अशी भीती आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी करण्यात आली होती. ती मान्य झाल्यानंतर त्याचा पुन्हा ‘डीपीआर’ तयार करण्यात आला.
सांगली फाटा ते उचगाव या मार्गासह कागल शहरात उभारण्यात येणारा उड्डाणपूल आणि पंचगंगा नदीवर कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी उभारला जाणारा बास्केट बि—ज याचा डीपीआर तयार करण्यात आला. या डीपीआरचे, तसेच कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल ते सीपीआर चौक व पुढे शिवाजी पूल असा इंटरनल सिटी इलेव्हेटेड फ्लाय ओव्हर उभारण्यात येणार आहे, त्याचे सादरीकरण दि. 27 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत करण्यात आले होते.
या बैठकीत तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या उड्डाणपुलालाच दाभोळकर कॉर्नर ते परीख पूल या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचीही सूचना करण्यात आली होती. त्यानुसार या पुलाचाही प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
लवकरच अंतिम मंजुरी शक्य
हे सर्वच प्रस्ताव केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. सांगली फाटा-उचगाव, कागल शहरातील उड्डाणपूल आणि बास्केट बि—जला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे त्याच्या निधीच्या प्रस्तावालाही तत्काळ मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याबरोबरच शहरातील दोन उड्डाणपुलांचे प्रस्तावही मंजूर होतील, त्यासाठी प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक घेऊन, त्यांच्याकडे पाठपुरावा करू, असेही लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले होते. त्यामुळे या उड्डाणपुलांच्या मंजुरीचीही दाट शक्यता आहे.